
तेरड्याने
सजले
रान
काही जागा अशा असतात की ज्यांच्यापासून तुम्ही कितीही दूर जाण्याचा
प्रयत्न केलात तरी ते शक्य नसतं. त्या गावाचा....तिथल्या
प्रत्येक कणाचा आणि आपला जन्मापासूनचा ऋणानुबंध असतो...हा संबंध कधीही दिसत
नाही...जाणवत नाही...पण त्याचे अस्तित्व असते.
या गावाने आणि तिथल्या गुरुजनांनी दिलेले संस्कार आपल्यात सामावलेले
असतात...या आठवणी नेहमी सोबत असतात. त्यांचा गवगवा करायचा नसतो. त्या आठवणी तेवढ्याच प्रेमाने जपायच्या
असतात...अशा माझ्या सदैव आठवणीत असलेलं म्हणजे आमचं गांव रेवदंडा-चौल...आणि आमचे
गुरुजी...वार्डे गुरुजी...


गावच्या या मेव्यासाठी जसा अट्टाहास
होता...तसाच अट्टाहास आमच्या गुरुंच्या भेटीसाठी...आमचे वार्डेगुरुजी...या
गुरुजींनी आम्हाला काय दिलं हा प्रश्न कधी पडलाच नाही. कारण गुरुजींनं जे दिलं त्याची पोचपावती त्यांना
कधी देणं शक्य होणार नाही. लहान वयात
संस्कार दिले...गुरु..शिक्षक म्हणून ज्ञान दिले...समाजात वावरण्याचे बळ
दिले...पडत्या काळात या गुरुजींनी असामान्य असा आधार दिला. जेव्हा जगाने पाठ फिरवली तेव्हा ते आमच्या सोबत
होते. त्यांच्या आधारात हा पडता काळ कधी
सरला हे समजलं नाही. त्यामुळे गुरुंजींची
आठवण आल्याशिवाय आताही एक दिवस जात नाही.
आता ते आमच्या मुलांचे गुरुजी आबा झाले.
त्यांच्यावरही तेवढीच माया आणि आशीर्वाद...या आगळ्या ओढीमुळे त्यांना
भेटायला, त्यांच्याबरोबर बोलायला सदैव तयारी असते. ओढ असते...गावाला जाण्याचा मुख्य हेतू मुळात
गुरुजींची भेट घेणे हाच असतो...त्यामुळे गेल्या गेल्या गुरुजींची भेट झाली....आता
गुरुंजींचे वय झालेले...पण आवाज तसाच कडक...काय ग कशी आहेस...अशीच नेहमीची साद...त्यात
ओरड्यापेक्षा आपलेपणाचा ओढाच अधिक....त्यांच्याबरोबर कितीही बोललं...तरी समाधान
होत नाही. त्यांच्याबरोबर बोलून त्यांचे
आशीर्वाद घेऊन पुन्हा परतीच्या वाटेवर निघाले...
वार्डेगुरुजींच्या घरासमोरच रामेश्वराचे
मंदिर....भलीमोठी पोखरण...या रामेश्वर मंदिराला पांडवकालीन इतिहास...संपूर्ण
दगडाचे बांधकाम...मंदिरासमोर मोठा नंदी...कधीही
जा...अगदी भर मे महिन्यात गेलं तरी
हे मंदिर अगदी गार...थंड हवेनं भरलेलं असतं...या महादेवाचे दर्शन घेतलं...मग
भरलेली पोखरण खुणावत होती...अगदी काठोकाठ भरलेल्या पोखरणीत बघावं तिथे छोटे-छोटे
मासे दिसत होते. मध्येच कासव ही दिसलं...बराच
वेळ या पाण्याकडे बघत राहिले...शेवटी न राहून थोडा वेळ पाण्यात पाय सोडून बसले...लहानपणींच्या
कितीतरी आठवणींचा आरसा या पोखरणीमध्ये दिसला....पाठीवर सुगड बांधून पोखरणीत
मारलेली डुबकी आठवली...आणि श्रावणी सोमवारी आईबरोबर पुजेसाठी केलेली तयारीही आठवली...मंदिरासमोरचे
दिपस्तंभ लागल्यावर त्या दिव्यांच्या उजेडाकडे बघतांना वाटलेला आनंद आठवला...कितीतरी
वेळ निशब्द बसून राहीले...पण किती वेळ...शेवटी नव-याने निघायची खूण केली...घरी
लेकाला एकटाच सोडून आलेले...शिवाय त्या ट्रॅफीक नावाच्या नव्या राक्षसाची धास्ती...त्यामुळे
पुन्हा एकदा रामेश्वराला नमस्कार केला आणि परतीचा प्रवास सुरु झाला.
खरतर रेवदंडा-चौल मध्ये अगदी नाक्यानाक्यावर
मित्र-मैत्रिणींची घरं...पण ही फेरी
फक्त वार्डेगुरुजी आणि त्यांच्या आशिर्वादासाठी
होती...त्यामुळे या सर्व मित्र-मैत्रिणींना मनातल्या मनात स्वारी बोलून परतीच्या
वाटेवर निघाले...पुन्हा तिच हिरवळ...आपल्या शेजारच्याबरोबर रंगांची स्पर्धा करणारी
तेरड्याची फुलं...तेच सजलेले बाजार....नकळत पुन्हा काही ठिकाणी गाडी थांबून थोडी
खरेदी....आणि आपल्या घराची वाट...जातांना पेण नंतर गावची ओढ लागली होती. आता परतीच्या वाटेवर पेण सोडलं आणि ट्रॅफीकचे
रंग दिसू लागले...उन्हाचे चटके आणि धुळीचे लोट गाडीत येऊ लागले...मग काय, काचा
नकळत वर गेल्या...एसीचा गारवा सुरु झाला...अर्थात तो शरीराला लागत होता...मनात
मात्र तो रामेश्वराच्या मंदिरातला गारवा साठला होता आणि आमच्या वार्डे गुरुंजींचे
बोल...आता पुढच्या काही महिन्यांसाठी हा साठा पुरेसा आहे...
सई बने
डोंबिवली
-------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
सुंदरच !
ReplyDeletevery nicely written. actually we sarrounded by nature. but we have built a selfe centered life so we just ignore such beautiness of nature.
regards
Ved