सुख म्हणजे काय असतं.....

बुधवार किंवा गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास एक फोन आला.  नेमका तेव्हाच डोळा लागला होता.  बाहेर पाऊस धो-धो पडत होता.  घरी नेट ही नव्हतं...त्यामुळं काही काम नाही.  मग सर्वात चांगला उपाय जवळ केला आणि झोपायचा बेत केला.  पण नेमका तेव्हाच फोन वाजला.  साता-याहून फोन.  लॉकडाऊन चालू झालं आणि एका मित्रानं गाव गाठलं होतं.  त्याचाच फोन....मी म्हटलं, तुला गावी काही काम नाही का,  जरा आराम कर ना...तर म्हणाला, तुला सोनं दाखवायचं होतं...त्यासाठी फोन केला...थांब व्हिडीओ फोन करतो....म्हणत त्यानं फोन कट केला...आणि पुन्हा व्हिडिओ फोन केला...समोर सोनं होतं...हिरव्या रंगाचं सोनं...त्याच्या शेतातलं सोनं...हिरवंगार शेत दाखवून तो मित्र बोलू लागला...बोलण्यापेक्षा त्याच्या डोळ्यातून येणारे अश्रू सर्व काही सांगत होते....

या फोनमुळे माझी दुपारची झोप उडाली.  प्रसादचा फोन होता.  गेल्या पंधरा वर्षापासून आमची ओळख...मुंबईमध्ये तो शिक्षण घेण्यासाठी आला आणि या शहराचाच झाला.  शिक्षणानंतर इथेच नोकरी मिळाली.  मग लग्न झालं.  बायको गावचीच...पण ती सुद्धा प्रसादसारखीच शिक्षणासाठी मुंबईत आलेली आणि शहरातली झालेली.  नवरा-बायको  दोघांचीही नोकरी.  संसार गाथा...मलं...त्यांचे शिक्षण...शाळा...सुट्ट्यांमध्ये गावाला जायचा.   गावी आई वडील आणि मोठा भाऊ...त्याचं कुटुंब.  शेती आहे.  अगदी भाजीपाला आणि कडधान्यांचे पिक ते घेतात.  शेती मोठी आहे.  पण आता त्या शेतीकडे फारसं लक्ष देता येत नव्हतं.  त्याच्या भावाचं मध्यंतरी कसलंतरी ऑपरेशन झालं.  त्यामुळे भाऊही शेतीमध्ये मेहनत करु शकत नव्हता.  आई-वडील प्रशांतला यावरुन अलिकडे बोलायचे.  त्यांचा फोन आला की तो याबद्दल सांगायचा.  आई-वडीलांच्या समाधानासाठी मुलांना सुट्ट्या लागल्यावर प्रशांत महिनाभरासाठी जायचा.  त्यातही अलिकडच्या तीन वर्षामध्ये महिनाभर रहाणेही शक्य नव्हते.  बायकोलाही नोकरीमुळे रहाणे शक्य होत नव्हते....मुलांना फक्त आजी आजोबांकडे सोडायला जायचा....मग आठवडाभर राहून परत येत असे....येतांना आईवडील वर्षाची कडधान्य, मसाले, पापड आणि भाजीपाला देत असत.  प्रसाद दरवेळी हा गावचा खाऊ आला की घरी येत असे...त्याच्याकडचे पापड आमच्याकडे आवडीचे.... शिवाय त्याच्या घरी हळदीचं पिक येतं, ही घरची हळद तो न चुकता तो आमच्याकडे घेऊन येतो...गावी भरपूर आहे ग...पण जायला जमत नाही...हा त्याचा खास ठेवणीतला डायलॉगही सोबत असे...

हा प्रसाद यावेळी गावी सर्वात जास्त काळासाठी त्याच्या गावी गेलाय.   कोरोनाचं संकंट आलं.  लॉकडाऊन लागू झालं...प्रसादनं कुठूनतरी पास काढला.  त्याची बायको जिथं कामाला जात होती तिथून तिला सुट्टी देण्यात आली.  प्रसादला घरातून काम करायला परवानगी मिळाली होती.  मुलांच्या शाळांना तर सुट्टीच होती. 

इथलं सगळं चंगूगबाळं गुंडाळून हा गावाला गेला.  कोरोनाचं संकंट आल्यावर पहिल्यांदा अत्यंत गोंधळाची स्थिती होती.  त्यामुळं पहिल्या पंधरा दिवसात प्रशांत गावी गेल्याचं माहित नव्हतं.  साधारण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याचा फोन आला, तेव्हाच कळलं तो त्याच्या कुटुंबासह गावी गेलाय ते...तेव्हा एप्रिल महिन्याच्या झळा लागत होत्या.  गावी इंटरनेटचा प्रॉब्लेम येत होता.  शिवाय पाण्याचाही प्रश्न होताच.  प्रसादचा तक्रारीचा पाढा चालू होता.   त्याच्या फ्लॅटला कुलूप लावून तो गेला होता.  पण आता त्याला त्या घराची आढवण येत होती.  ते्व्हा त्याला इथली परिस्थिती सांगितली...लवकरच सर्व ठिक होईल अशी अपेक्षा त्यानं व्यक्त केली.  मे महिन्याच्या सुरुवातीसही त्याचा फोन आला होता.  आता थोडा गावी तो स्थिरावला होता.  मे महिन्याच्या गरमीचा त्रास होत होता. पण विहिरीमध्ये पाणी ब-यापैकी होतं.  त्यात मुलांना पोहायला शिकवलं.  सुरवातीला गावी राहायला कंटाळलेली त्याची बायकोही पापड, लोणची यामध्ये रमली.  शिवाय सासू आणि मोठ्या जावेबरोबर शेतात भाजी लागवडीसाठीही जायला लागली होती.  प्रसाद ऑफीसचं काम करत होता.  आता नेट प्रॉब्लेम दूर झाला होता.  शनिवार-रविवार मात्र वडीलांबरोबर पूर्ण वेळ शेतीच्या कामामध्य तो पूर्णपणे रमला.  तरीही मुंबईला कसं चालू आहे...याची चौकशी चालू होतीच. 

जून महिन्यामध्ये प्रसादचा फोन आला नाही.  आता त्याचा थेट व्हिडीओ फोन आला.  गावी रमला असेल  असे अनेकवेऴा वाटले.  पण मलाही त्याला फोन करता आला नव्हता.  आता त्याचाच फोन आला होता.  प्रसाद त्याच्या शेतात उभा होता.  मक्याचं पिक लावलं होतं.  सोबत भाजीपाल्याची लागवडही चांगली झाली होती.  फ्लॉवर, कोबी, वांगी, टोमॅटो, भेंडी यांची लागवड छान झालेली होती.  प्रसादची बायकोही त्याच्या सोबत होती.  हिरवा मळा दाखवतांना प्रसादच्या चेह-यावर अभिमान होता...आणि डोळ्यात आनंदाश्रू...त्यानंतर बराच वेळ तो बोलत होता.  मार्च महिन्यात गावी आल्यावर काही दिवस त्याचा शहरी अॅटीट्यूड चालू होता.  एप्रिल महिन्यात त्याला जाणीव होऊ लागली

होती की कोरोनाचं संकंट लवकर जाणार नाही.  त्याच्या ऑफीसमधूनही त्याला कल्पना देण्यात आली होती.  पुढचे दोन महिने घरातून काम करण्याची मुभा देण्यात आली होती.   आपल्याला आणखी दोन महिने गावी काढावे लागतील म्हणून थोडी चिडचिड झाली होती.   गावच्या शेतात काम करण्याची सवय पार मोडली होती.  त्यात मुलांच्याही सवयी बदलल्या होत्या...पण काही दिवसांनी मुलं गावी रमली होती.  आजी आजोबा नातवंडं इथेच रहाणार म्हणून आनंदात होते.  आजी रोज नातवांसाठी गरम गरम भाक-या आणि मळ्यातील ताजी भाजी करत होती.  त्याच्या आजारी भावाची तब्बेत त्याच्या नुसत्या जाण्यानं सुधारली होती.  संध्याकाळी दोघंही भावंड एकत्र गप्पा

मारत बसत...प्रसाद थोडा रिलॅक्स झाला होता...शनिवार-रविवार दोघंही भावंड शेतावर मेहनत करत होती...वडीलांना याशिवाय मोठं सुख नव्हतं....इकडे त्याची बायकोही रमली होती.  गावी कोरोनाच्या बाबत काळजी घेण्यात येत होती.  पण पाहुणे मंडळी काळजी घेऊन येत होती.   त्याच्या बायकोचे आई वडीलही भेटून गेले.  पाऊस सुरु होणार म्हणून घराची डागडूजी सुरु केली.  मग प्रसादला घराला रंग देण्याची कल्पना सुचली.  गावच्या बाजारात ठराविक दिवशी दुकानं सुरु होत होती.  तिथून रंग आणि रंग मारण्यासाठी लागणारे सामान आणले...दोघा भावंडांनी स्वतः घर दुरुस्त केले.  घराला रंग दिला.  मुलांनाही उत्सह आला होता.  त्यांनी कुंड्या सजवल्या...नातवंडांनी भिंतीवर चित्र काढली.  प्रसादचं घर वेगळं वाटू लागलं.  इकडे शेतात लॉकडाऊनमध्ये मजूर मिळत नव्हते...त्यामुळे प्रसाद ऑफीसची कामाची वेळ अॅडजेस्ट करुन भावाला सकाळी लवकर शेतात मदत करत होता.  बाकीच्या वेळी त्याची पत्नीही जावेबरोबर शेतात राबत असे.  त्याची दोन्ही मुलही शेतात काम करत होती. 

त्यात गावाकडे शहरातील तरुणंचा ओघ वाढला.  शहरात कोरोनाचा धोका वाढल्यानं आपल्या गावी येण्यासाठी ही मंडळी उत्सुक होती.  गावी आलेल्या या तरुणांनी कोरंटाईनचा नियम पाळत स्वतःला थोडे दिवस वेगळं ठेवलं.  आता ही मंडळीही आपापल्या शेतात राबत होती.  त्यात गावांत असलेल्या पाण्याच्या समस्येची झळ या शहरात राहिलेल्या मंडळींनाही बसली...प्रसादच्या शेतात एक विहिर होतीच.  त्यात सर्वांनी मिळून आणखी एक विहीर खोदली.  तशाच विहिरी अन्य शेतातही खोदण्यात आल्या.  पंधरा जून नंतर गावी पाऊस छान झाला.  या पावसांनं या विहीरी काठोकाठ भरल्या..एप्रिल-मे महिन्यात जाणवणारी गर्मी पावसानं गायब झाली.   त्याची आई किती खूष होती हे तर विचारुच नका...मुलगा कधी नव्हे ते एवढा राहीला होता.  त्यामुळे रोज नवनवीन पदार्थ बनवून ती मुलाला आणि नातवंडांना खायला घालायची.  प्रसादच्या मोठ्या मुलाची उंची थोडी कमी होती.  पण गावी रहायला आल्यापासून मुलगा उंच झाल्याची जाणीव त्याला झाली.  धाकटी मुलगी कायम आजारी पडायची...पण गावातल्या मोकळ्या हवेनं आणि आजीच्या हातच्या जेवणानं ही मुलगीही आजारपण विसरली होती. 

एकूण काय प्रसाद भलताच खूष होता.  मुंबईमध्ये असलेले त्याचे मित्र फोन करुन त्याला सांगत होते की ते फ्लॅटमध्ये कसे बंद झाले आहेत.  कोरोनामुळे एखाद्या चोरासारखे त्यांचे आयुष्य झालं होतं.  त्यामानानं गावाकडे मोकळीक होती.  प्रसाद, त्यानं घेतलेल्या निर्णयावर खूष होता.  त्यानिमित्तानं आपल्या गावची त्याला नव्यानं ओळख झाली होती.  कोरोनानं त्याला त्याचं गाव, आणि कुटुंब परत मिळालं.  शहरात राहिल्यावर आपण खूप स्टाईलिश झाल्याचा त्याचा समज दूर झाला होता.  सुख म्हणजे नक्की काय याचा शोध त्याला लागला होता...बराचवेळ गप्पा मारल्यावर त्यानं फोन ठेवला. 

त्याच्या गप्पा झाल्यावर मी बराचवेळ प्रसादाचाच विचार करत होते.  काहीवेळानं सहज एक ऑनलाईन पेपर चाळला.  त्यात धोनीची बातमी होती.  भारताचा हा कूल कॅप्टन शेती करत होता.  म्हणजे मूळं पाण्याच्या शोधात बरोबर जातात तर...आमचा प्रसादही त्याच मुळांचाच एक भाग होता...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


Comments

  1. खूपच छान लेख

    ReplyDelete
  2. ताज़ातवाना करणारा लेख।वाचून आनंद झाला।

    ReplyDelete

Post a Comment