.....ही सासू.....ती सून


.....ही सासू.....ती सून

पायाला लागल्यामुळे आठवडाभर घरी आराम...आणि पाहुण्यांची रिघ...कधी नव्हे ती दिवसभर बसून गप्पा मारण्याची मौज...पण हा आनंद घेत असतांनाच आशा आणि केतकी या सासू सुनेच्या जोडीने मात्र मला इकडे आड तिकडे विहीर....अशा अवस्थेत नेलं....

आशा माझी ट्रेनची मैत्रिण...काही वर्षापूर्वी जेव्हा नोकरी करत होते, तेव्हा ठरावीक ट्रेन असायची...मग नेहमीचा ग्रुप...ओळखीचे चेहरे.  त्याच्यातच आशा भेटली..माझ्यापेक्षा मोठी...पण मैत्रीच्या आड कधी वय आलं नाही.  ही ओळख पुढे आणखी पक्की झाली...ती आमच्या परिसरातच रहाणारी...त्यामुळे अनेकवेळा एकाच रिक्षाने प्रवास व्हायचा...येतांनाही एकच ट्रेन...नंतर मी नोकरीला रामराम केला...ट्रेनचा प्रवास कमी झाला.  पण
आशा कायम राहीली.  अगदी शनिवार-रविवार भेटायला येत असे...आताही येते.  माझ्या घरी प्रत्येक कार्यक्रमाला ती असते...तसेच तिच्या घरच्या प्रत्येक कार्यक्रमाला माझी हजेरी.  तिच्या मुलाच्या लग्नाला तर खरेदीपासून
जेवणाचा मेनू ठरवेपर्यंत मी होते.  तिची सून केतकी...ती सुद्धा छान.  माझं जसं आशाबरोबर जमलं, तसंच केतकीबरोबरही.  केतकीने फॅशनडीझायनींग केलेलं...पार नरिमन पॉईंट सारख्या हायप्रोफाईल भागात मोठ्या कपड्याच्या
मोठ्या ब्रॅन्डमध्ये ती काम करतेय.  लग्नापूर्वी ती भांडूपला रहायची...आता डोंबिवली...त्यामुळे प्रवासाची दगदग वाढली...पण तिला ती नोकरी सोडायची नाही....आशाच्या मुलाचं लग्न झालं तरी आशा नोकरी करत होती...ब-याचवेळा आम्ही मैत्रिणी भेटलो की तिला चिडवायचो...आता बस्स कर की...किती पैसे कमवणार आहेस...पण आशा म्हणायची घरी बसलं की मला वेड लागतं...त्यामुळे रिटायर होण्याच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तिने नोकरी केली.  ऑफीसमध्ये तिचा छान सत्कार झाला.  घरी केतकीनंही छोटासा कार्यक्रम ठेवला.  आम्ही काही जवळच्या मैत्रिणीं आणि पाहुण्यांना हॉटेलमध्ये जेवण ठेवलं होतं...आशाचा नवरा आधीच निवृत्त झालेला... पण एका लायब्ररीमध्ये त्यांनी काम पाहिलं होतं....वेळ कसा जाणार हा त्यांचाही प्रश्न...त्यामुळे निवृत्त झाल्यावर अगदी दुस-याच दिवसापासून ते या नवीन छोट्या नोकरीत आनंदाने सामावून गेले.  आता आशाचीही भूणभूण सुरु झाली...याची पहिली झलक सुनेनं ठेवलेल्या डीनर पार्टीमध्येच मिळाली.

आशाच्या लेकानं आई-वडीलांना छान परदेश फिरायला जा...मी बुकींग करतो अशी ऑफर केली...आशाच्या नव-यानंही तसाच प्लॅन केला होता...त्यात काहींनी केतकीला छेडलं...आता सासू मोकळी झाली, केतकी आता तू चान्स घे...बाळ येऊ दे घरात...केतकी मोकळेपणानं हसली....त्यांच्याही लग्नाला वर्ष होतं आलं होतं...पण केतकीची रोजची होणारी ओढाताण...ऑफीसवरुन येतांना होणारा उशीर...सर्व आम्ही बघत होतो.  आता आशा नोकरीतून मोकळी झाली म्हणजे, केतकी थोडी निर्धास्त होईल असं वाटत होतं...पण हे सर्व विचार मनात येण्याच्या आगोदरच आशाने त्या डीनरडिप्लोमसीमध्ये जाहीर केलं...मी काही मुलंबिलं सांभाळणार नाही...आयुष्यभर मी मन मारुन घरासाठी काम केलंय...आता मी मोकळी झालीय...मी आता मस्त फिरणार...माझी हौसमौज करणार...तिच्या या बोलण्यावर केतकीनं सूचकपणे तिच्या नव-याकडे, म्हणजे आशाच्या लेकाकडे बघितलं होतं.  आम्हीही हा विषय तेवढ्यावरच थांबवून जेवणाचा आस्वाद घेतला...
या प्रकरणाला आता चार-पाच वर्ष होऊन गेली.  केतकीला मुलगी झाली...आशा कायम बाहेर...कधी बहिणीकडे...कधी माहेरी...कधी गावी...कधी कोणा नातेवाईकांच्या लग्नाला...कधी फिरायला...कधी देवधर्म राहीला म्हणून तिर्थयात्रांवर...केतकीनं तिला सांगून बघितलं, पण याबाबतीत या सासू सुनांचं पटलं नाही...काही दिवस केतकीची आई इकडे रहायला होती...आता केतकी लेकीला पाळणाघरात ठेवते...आणि ऑफीसला जाते...एकूण काय तिचीही ओढाताण वाढलीय...कधी रस्त्यात भेटली तर नेहमीप्रमाणे बोलायची...हळूच
आईंना जरा सांगा ना...म्हणून पुढे व्हायची...
मागच्या आठवड्यात ही सासू सुनेची जोडी मला बघायला म्हणून आली, आणि या मोठ्या प्रश्नावर जणू पंचायत सुरु झाली.  आशाला निवृत्त होऊन पाच वर्ष झाली.  तिला पुन्हा छोटेखानी नोकरी करायचीय.  पण नातेवाईक, फिरायची हौस, महिला मंडळ या सर्वांत तिनं स्वतःला गुंफून घेतलंय.  घरातील सर्व आटपून ती तिच्या या चक्रात व्यस्त...केतकीचं बाळंतपण तिनं हौशींनं केलं...काही महिने नातीला सांभाळलंही...पण नातीसाठी कायम घरी बसायची तिची तयारी नाही...इकडे केतकी नोकरीत बढतीवर...तिला ऑफीसमधून काही महिन्यांसाठी परदेशात ट्रेनिंगला पाठवत होते...पण छोट्या मुलींमुळे ही संधी सोडावी लागली...आता पुन्हा तशीच संधी आलीय...पण आशानं आधीच या चार महिन्यांचा प्लॅन जाहीर केला...त्यामुळे तिनं केतकीला यावेळीही ट्रेनिंगला नकार देण्याचा आग्रह धरला होता...एरवी या दोघींमध्ये कधी वाद झाले नाहीत...हा मुद्दा सोडला तर दोघींही एकमेकींना समजून घ्यायच्या...पण मी सुद्धा मुलाला सांभांळून नोकरी केली...तू सुद्धा तुझ्या मुलांना सांभाळून नोकरी कर...आम्हाला मध्ये घेऊ नकोस हा आशाचा मुद्दा आता कळीचा ठरला होता...माझी विचारपूस करायला या दोघी आल्या खरं पण चर्चा सुरु झाली ती या कळीच्या मुद्द्यावरच....

केतकीचा परदेश दौरा आणि त्यात तिला लेकीला शाळेतही घालायचे होते.  त्यामुळे आता सासूनं नातीची जबाबदारी सांभाळावी अशी अपेक्षा होती.  आशाला हे काही मान्य नव्हतं...तुझं काय मत असं बोलून दोघीही माझ्याकडे बघू लागल्या...मला काय बोलावं ते सुचेनासं झालं...माझ्या पायाला दुखतंय...जरा आराम करते असं बोलून या दोघींनाही टाळावं असंही मनात आलं...पण आज ना उद्या या दोघी पुन्हा माझ्यासमोर येणार होत्या...खरंतर प्रश्न चार महिन्यांचा होता...केतकी चार महिन्यात परदेश दौ-याहून परत येणार होती...त्यामुळे आशा पुन्हा मोकळी होणार होती...एकदा हो म्हटलं तर मी कायमची अडकेन या आशाच्या बोलावर मात्र केतकी भडकली...मला बघायला आलेल्या या सासू-सुनांमधला वाद बघायची वेळ माझ्यावर आली.  दोघीही ऐकेनात...तुमची नात आहे ना ती...मग नातीचं आजी नाही करणार तर कोण...आपण एकत्र आहोत म्हणून वेगळं असतो तर तुझं तू केल असतंस ना...अजून किती फिरायचं आहे...आमच्या पैशांनी हौसमौज करतोय...तुमच्याकडे थोडीच मागतोय...बापरे...या दोघींही चांगल्याच चिडल्या होत्या...मी दोघींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला...आशाही ऐकेना...केतकीही चिडली...शेवटी जाऊदे म्हणत दोघी निघाल्या...निघता निघता आशा म्हणाली...तू सुद्धा विचार करुन ठेव...तुझ्यावरही अशीच वेळ येणार आहे एक दिवस...त्यासरशी केतकी म्हणली...त्या तुमच्यासारख्या सासू नसतील...सुनेला समजून घेतील...देवा...आतासा माझा लेक शिकतोय...पुढच्या अॅडमिशनची मला चिंता आहे...त्यात हे विचार कशाला...
या दोघी गेल्यावर ग्लासभर पाणी पिऊन मी मन शांत करण्याचा प्रयत्न केला...विचार केला चुक कोणाची होती...सासू..सासू झाल्याचं मान्य करतेय...पण सासूपणाची जबाबदारी तिला नकोय...तिनं आयुष्यभर केलेल्या तडजोडीच्या बदल्यात आता, हौसमौज करतेय...आणि सून सर्व जबाबदारी सांभाळून आपल्या करियरला आकार देतेय...कोण बरोबर आहे...कोण चुक आहे...पण एकमात्र नक्की दोघींही स्वतःला मी पणाच्या चक्रात गुंफवत
होत्या...या मी पणातून बाहेर आल्या तर दोघीही एकमेकींना समजून घेतील...मी चार दिवस हॉस्पिटलमध्ये असतांना शेजारच्याच बेडवर एक आजी होती.  वय वर्ष ऐशीं.  सून आणि लेक दोघीं त्यांना हॉस्पिटलमध्ये
अॅडमिट करुन गेल्या त्यानंतर आल्या चक्क दोन दिवसांनी...सगळं तर मिळतंय...जेवणाचीही सोय आहे...कुणी कशाला हवं.  असा मुद्दा...ती आजी दिवसभर एकटी दाराकडे बघत बसायची...किंवा माझ्याबरोबर गप्पा...भेटायला मुलगी नाही की मुलगा नाही...सूनही अगदी पाच मिनीटं...मी निघाले तेव्हा ही आजी अगदी मलूल चेहरा करुन बसली होती...मला तिचं वाईट वाटलं होतं...आशा आणि केतकीला या आजीची गोष्ट नक्की सांगायला हवी असा मनात विचार आला.  मतभेद असायला हवेत...पण मनभेद नकोत...नाहीतर जेव्हा माणसांची गरज असते...तेव्हा दरवाजाकडे नजर लावून बसायला लागतं...आणि एकांतात भूतकाळाला आठवावं लागतं....


सई बने
डोंबिवली

----------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा



Comments

  1. Sai real fact aahet yaa goshti doghi aapaaplya jagi barobar aahet parantu pratyekane aple roles and responsibilities and goals tharvane aavahyak aahet
    Tya peksha pudhe jahun apli jabadari etaranvar padanar nahi yaachi kalji gheun win win situations war kaam Karne aavahyak aste generation gap tar asnar aahech....

    ReplyDelete
    Replies
    1. रमाकांतजी, तुम्ही बरोबर शब्द वापरलात...प्रत्येकाचा एक रोल असतो...तो मान्य करुन पुढे चालावे लागते...पण मला सर्वच करायचे आहे, असं म्हटलं तर पुढे कसं जाणार हा प्रश्न असतो...

      Delete
  2. लेख छान आहे. घरोघरी मातीच्या चुली. कुटुंब संस्था टिकवण्यासाठी मोठ्या माणसांनीच पुढाकार घेऊन घराबाहेर धावणाऱ्या मनाला आवर घालायला हवा. आपली inning खेळून झाली, आता पुढच्या पिढीला संधी द्यावी की जरा !

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना...प्रत्येकाची वेळ असते...आणि ती सरल्यावर आपल्या मागील व्यक्तीला आपल्या जागेत सामावून घ्यावे लागते...नाहीतर वाद हा आलाच....

      Delete
  3. खुपच सुंदर आजच्या परिस्थिती चे यर्थात वर्णन

    ReplyDelete

Post a Comment