आरोग्य म्हणजे काय रे भाऊ
जाणवतंय मला. त्यामुळेच आता थोडा ब्रेक घेण्याच्या विचारात आहे. नोकरी बदलतोय. तिथे थोडा कमी पगार आहे. पण कामाचा ताणही कमी आहे. वर्ष-दोनवर्ष हे काम करेन. नंतर काहीतरी स्वतःचं चालू करणार. बायकोही तयार झालीय. आई बाबा पहिल्यांदा टेन्शनमध्ये आले होते, मी हा निर्णय सांगितल्यावर थोडे निवांत झालेत. मी रोज सकाळी सात वाजता येईन. आठवड्याची आधी ट्रीटमेंट घेतो, मग ठरवूया. माझ्या मागून एक तरुण आला आणि निघून गेला. मी त्या थाळी मसाजसाठी बसले होते. पायाखाली ती थाळी फिरत होती. माझी नजर आणि कान मात्र त्या तरुणाच्या मागे होते. तो निघून गेल्यावरही मी मान वाकून वाकून त्याच्याकडेच बघत होते. आणि नंतर माझी तिच नजर त्याला दरवाजापर्यंत सोडायला गेलेल्या त्या सेंटरच्या माणसाकडे लागली. माझ्या नजरेतले हजारो प्रश्न जणू त्यानं ओळखले. दोन दिवस झालेत, आपल्या सेंटरमध्ये येतोय. अहो, पाठीचं दुखणं मागे लागलंय. मानही दुखतेय. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय. आधी तर सरळ चालताही येत नव्हतं. आता आपल्याकडे ट्रिटमेंट आणि व्यायाम दोन्ही चालू केलय. आत्ता हा सरळ चालायला लागलाय. वय काय, हा प्रश्न मात्र विचारु नका. पस्तीशी झालीय आत्ता.
त्याच्या या उत्तरावर मी अरे देवा म्हणत डोक्याला हात लावून घेतला. त्या तरुणाला गेली सहा महिने जास्त त्रास जाणवत होता. कोरोना काळात वर्क
फ्रॉम होमचा फटका बसला. दिवसरात्र त्या लॅपटॉपसमोर बसून. दुसरं करणार काय, म्हणत त्यानं ऑफीसच्या कामात स्वतःला बुडवून घेतलं. पण आता त्याचा फटका बसू लागलाय. पाठ, मान दुखते म्हणून त्यानं थेट जिम लावलं. डॉक्टरांकडे जाण्यासाठी वेळ नाही. पेनकिलरचा सहारा घेतला. असा महिना काढला. जीममुळे त्रास अधिक वाढला. काही दिवस तर उठताही येत नव्हतं. शेवटी या पस्तीशीच्या मुलाला त्याच्या बाबांनी पकडून डॉक्टरकडे नेलं. त्यांनी आठवड्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतलं. आता मसाज आणि व्यायाम करायला सांगितलाय. पण यानं कधीही व्यायाम केलेला नाही. फक्त शाळेत असतांना पीटीच्या पिरेडला हातपाय हलवले तेच आणि गल्ली क्रिकेट. मग आता रोज सकाळी सेंटरवर येतो. त्याचे आम्ही थोडे व्यायामाचे प्रकार घेतो. मग मसाज आणि तेलाचा शेक असा प्रकार चालू आहे. मी त्या थाळीवर पाय ठेवले होते. मध्ये मध्ये त्यावर तेल सोडत तो माणूस मला सांगत होता.
अर्धा तासाच्या माझ्या या फूटमसाजच्या वेळेत खूप माहिती मिळाली. मुख्यतः तरुणांमध्ये मान, पाठ दुखीच्या तक्रारी वाढल्या आहेत. असे अनेकजण आता सेंटरमध्ये येतात. सुट्टीच्या दिवसात ट्रिटमेंट घेतात. काहीतर अगदी पंचवीशीच्या घरातील आहेत. काहींना नुकत्याच नोक-या लागल्या आहेत. त्यापैकी बरेचजण सांगतात, एवढा वेळ बसायची सवयच नाही. त्यामुळे त्रास होतो म्हणे. काय माहित, या मुलांना साधी-साधी आसनं येत नाहीत हो. काय बोलणार. तो माणूस बोलत असतांना मी पुन्हा त्या तरुणाचा विषय काढला. मला त्याला होत असलेल्या त्रासाचं वाईट वाटत होतं पण त्यानं जो निर्णय घेतला होता, त्याचं अधिक कौतुक वाटत होतं.
खरंतर तिशी-पत्तीशी ही उमेदीची वर्ष म्हटली जातात. अशा वर्षात मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्यापेक्षा कमी पगारातली नोकरी स्विकरणं हा खरा धाडसाचा निर्णय. पण आरोग्याचे मोल कोणालाही नाही. मी माझ्याबरोबर संवाद साधणा-याला सांगितलं, या मुलाचं खरं तर कौतुक आहे. त्यानं नियमीत आरोग्याला वेळ दिला. सकाळी नियमानं योगा केला, थोडे व्यायामाचे प्रकार केले, तर त्याला पुन्हा डॉक्टरची गरज लागणार नाही. तो माणूस म्हणाला, आम्हीही त्याला सांगितलं होतं. नोकरी सोडू नकोस, फक्त कामाचं नियोजन निट कर. स्वतःला फक्त ऑफीसला बांधून घेऊ नकोस. पण त्याचे आई-बाबा काळजीत पडले होते. बाबा सत्तरीला आलेत, पण एकदम फिट्ट. दोघंही सकाळी तासभर चालतात आणि योगा करतात. आत्ता तेच बाबा या लेकाला योगा शिकवत आहेत. कामाच्या ताणामुळे त्याची मानसिक स्थितीही काही दिवस खराब होती. चिडचिडेपणा वाढला होता. अगदी लेकीला आणि बायकोलाही वेळ देता येत नव्हता. नात्यात दुरावा निर्माण व्हायला लागला होता. तेव्हा आई-बाबा पुढे आले. एवढा पैसा कमवून जर आरोग्य आणि नातंच राखता येत नसेल तर त्याचा उपयोग काय हा प्रश्न त्याला विचारला. तोपर्यंत दुखण्यानंही डोकं वर काढलं. चालताही येईना, तेव्हा कुठे बाबांचा सल्ला आठवला. थोड्या कमी पैशातही घर व्यवस्थित चालतं म्हणाला. आम्हाला काय हो, सेंटर आहे. आमचं कामच ते आहे. पण अशी तरुण मुलं आली की वाईट वाटतं. या वयात मणक्यात गॅप यायला लागली तर साठीला काय करणार.
मी माझे पैसे देऊन बाहेर पडले. मनातून तो मुलगा जाईना. उशीरा का होईना पण त्याला योगाचे महत्त्व कळलं होतं. मुळात नोकरीच्या नादात अनेकजण स्वतःसाठी साधा अर्धा तासही काढू शकत नाहीत. त्यात गुगल डॉक्टरांची भर. काही त्रास झाला की गुगलबाबावर सर्च करुन गोळ्या घेणा-
यांची संख्याही वाढलीय. मध्यंतरी अशीच मान दुखणारी एक परिचित काही दिवस माझ्याकडे योगासाठी येऊ लागली. आठवडाभरानंतर आता बरं वाटतंय, म्हणून व्यायाम थांबवला. अर्थात हा अनुभव ब-याचवेळा येतो. या सर्वात मला सेंटरमध्ये भेटलेला तरुण उजवा वाटला. भरपूर पैसा मिळवला म्हणजेच सुखी होता येतं, या विचारातून तो बाहेर आलेला वाटला. आरोग्य आणि कौटुंबिक सुख असेल तर बाकी सगळ्या त्रुटी आपोआप भरुन निघतात, हेच खरं.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा


.jpg)

कडवा सच. आजच्तया रुणाईला लवकर सुबुद्धी दे रे गजानना
ReplyDeleteअप्रतिम लेख,से एक कटु सत्य आहे.👍👍👌👌
ReplyDeleteखूप छान लेख विचार करण्यासारखं आणि ते फॉलो ही करण्यासारखं
ReplyDelete